मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा असल्याचे सांगितले. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या जन्माला यंदा २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड किल्ला परिसरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठीही विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
यासोबतच राज्यात ‘सामाजिक समरसता वर्ष’ साजरे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाले असून त्यासंदर्भात काही विशेष योजनाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या घोषणांमुळे राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.



